मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आला. यामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने राज्याच्या विधानसभा निवडणकीत 123 जागा लढवल्या. मात्र पक्षाच्या एकाही उमेदवाराला विजय संपादन करता आला नाही. जर एकही आमदार निवडून आला नाही तर ८ टक्के मते मिळवावी लागणार होती. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला 1.60 टक्के मत मिळाली आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेची धाकधूकही वाढली असून पक्षाची अधिकृत मान्यता धोक्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा सत्तेत असेल, असा दावा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही. पक्षाकडून तब्बल 123 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतरदेखील एकही जागा जिंकता न आल्याने मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या मतांचा टक्का अवघ्या 1.60 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण 2.25 टक्के इतके होते.
विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उतरविण्यात आल्याने पक्षासाठी आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मनसेला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही. गेल्या निवडणुकीत एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनाही कल्याण ग्रामीण मतदारसंघामधून यंदा पराभवाचा फटका बसला.
एकीकडे राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होत असली तरी त्यांचे मतांत रूपांतर होत नाही, हे पुन्हा एकदा विधानसभेच्या निकालानंतर दिसून आले. पक्षाकडून वर्षभरात कोणत्याही ठोस कार्यक्रमांचे आयोजन न करणे, पक्ष संघटना कायम सक्रिय न ठेवणे आणि धोरण सातत्याचा अभाव या प्रमुख कारणांमुळे पक्षाला यंदाच्या निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही. राज ठाकरेंसाठी 2024 विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची होती. कारण, मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकलाय आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेने 123 जागा लढवल्या आहेत. अधिकृत मान्यता टिकवण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला तीन आमदार आणि तीन टक्के मतांची गरज होती अथवा एकूण मतदानाच्या आठ टक्के मते मनसेला मिळवावी लागतील, जर सहा टक्के मते मिळाली तर दोन आमदार यावेच लागतील. जर एकही आमदार निवडून आला नाही तर ८ टक्के मते मिळवावी लागणार होती. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकही आमदार निवडणू आला नाही. तसेच पक्षाला केवळ 1.60 टक्के मत मिळाली आहेत. त्यामुळे मनसेची अधिकृत मान्यता धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
0 Comments