छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका)- आपल्या पुर्वजांच्या अपार संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य आणि लोकशाही राज्यव्यवस्था मिळाली आहे. प्रत्येकाला प्रगतीची संधी उपलब्ध होते. परिणामी आपले जीवन सुखी होते. म्हणूनच सुखी जीवनासाठी समृद्ध लोकशाही आवश्यक असून त्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे युवा संवाद या कार्यक्रमातून मतदार जनजागृती करत होते.
कार्यक्रमास तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक अक्षय जोशी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. आदेश जिंतूरकर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. शशिकांत ढिकले, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, अनेक युवक मतदार यादीत आपले नाव नोंदवित नाहीत. मतदार यादीत नाव असणे म्हणजे आपण आपल्या देशाचे नागरिक असल्याचा दस्तऐवज आहे. आपण आपल्या देशाचे मतदार असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
संविधानाने दिलेल्या मतांच्या अधिकारामुळे आपण आपल्या देशाचे भवितव्य ठरवू शकतो. जीवनात प्रगती करण्यासाठी जसे चांगले पर्यावरण आवश्यक असते तसेच लोकशाहीचे वातावरणही आवश्यक असते.
लोकशाहीमुळे प्रगती व विकासाच्या विविध संधी आपल्याला मिळतात. आपले अधिकार, हक्क यांचे संरक्षण होते. त्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
स्वागत प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे , प्रास्ताविक अक्षय जोशी, अध्यक्षीय मनोगत डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन मनोज मते यांनी तर आभार डॉ. देवेंद्र भुयार यांनी मानले.
०००००
0 Comments