नाशिक/दै.मू.वृत्तसेवा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल दिवाळीनंतर वाजणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका एकत्रित होणार नसून, त्या टप्प्याटप्प्याने होणार आहेत. कोणती निवडणूक आधी होईल, कोणती नंतर हे अद्याप निश्चित नाही. मात्रया निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीतही बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी, मतदान केंद्राची संख्या निश्चित करणे, मतदान यंत्राची व्यवस्था करणे, निवडणुकांसाठी आवश्यक असणाऱ्या अधिकारी कर्मचारी संख्याचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी आज नाशिक दौरा केला.
यावेळी, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने माहितीही दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व इलेक्शन एकत्रित करणेसाठी मनुष्यबळ कमी पडेल. त्यामुळे टप्याटप्याने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पण पहिले कोणते इलेक्शन होईल ते अद्याप निश्चित नाही. ऑक्टोबर अखेरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकियेला सुरुवात होईल. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक साठी व्हिव्हिपॅट मशिनचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
ते पुढे म्हणाले कि नाशिक विभागात 50 लाख 45 हजार मतदार आहेत, 4 हजार 982 मतदान केंद्र, त्यासाठी 8 हजार 705 कँट्रोल युनिट लागणार असून 17 हजार मतदान यंत्रांची गरज भासणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, दिवाळीनंतरच निवडणुकांचा बिगुल वाजेल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर केला जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट नसेल हा निवडणूक आयोगाचा निर्णय नुसता तुघलकीच नाही तर एकूण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे, असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच, व्हीव्हीपॅट गायब करण्यापेक्षा औपचारिकता म्हणून निवडणुकीचा जो फार्स करत आहात तो फार्स न केलेला बरा, असेही त्यांनी म्हटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतल्याने विरोधकांनी थेट सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावण्याचा इशारा दिला आहे.
खरं तर मतदारांनी ज्या उमेदवाराला ईव्हिएम मशीनवर मतदान केलं आहे. त्याच व्यक्तीला मतदान झालं आहे का? हे व्हीव्हीपॅटवर दिसून यायचं. आधीच ईव्हिएम वरुन देशभरात गोंधळ उडालेला असताना आता आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आयोगाचा निर्णय वादाच्या भोवर्यात सापडणार आहे.
0 Comments