रत्नागिरी : यंदा पावसाने २० जुलै २०२१ पूर्वीच जिल्ह्यात सरासरी २००० मिलिमीटरचा आकडा पार केला आहे. अतिवृष्टीचे हे प्रमाण पाहता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेच तर त्यातून पीक विमा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तारू शकेल.
पीक विमा उतरविण्यासाठी अल्प खर्च असून १५ जुलै ही अंतिम तारीख भाजपा खासदार, शेतकरी यांच्या मागणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २३ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे.
या संधीचा लाभ घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी २३ जुलै पर्यंत पीक विमा उतरवून आपले भात पीक आणि अन्य पीक सुरक्षित करावे आणि आपले संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन रत्नागिरीचे माजी आमदार तथा रत्नागिरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळा माने यांनी यांनी केले आहे.
शासनाशी करार केलेल्या इफ्को टोकियो विमा कंपनीकडून हा पीक विमा उतरवून घ्यायचा आहे.
१ हेक्टरसाठी ४५ हजार ५०० रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येते. तसेच याकरिता एकूण विमा प्रीमियम २ टक्के भरायचा आहे..
म्हणजे हेक्टरी ९१० रुपये भरावे लागतात यामध्ये ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्य सरकार विम्याचा प्रीमियम भरत असते.
शेतकऱ्याला प्रति गुंठ्याला फक्त ९ .१० रुपये भरावे लागतील. गुंठ्याला जास्तीत जास्त ४५५ रुपयांचे संरक्षण या पीक विम्याद्वारे मिळते.
जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षात अनेक चक्रीवादळे येऊन नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकऱ्याला बियाणे, खत, मजुरी किंवा शेतीविषयक कोणतीही नुकसान भरपाई मिळू शकत नाही, हे शेतकऱ्यांनी अनुभवले आहे.
त्यामुळे पीक विमा खूपच महत्त्वाचा आहे. या पूर्ण शेती हंगामासाठी या विम्याचे संरक्षण कवच शेतकऱ्याना मिळते. म्हणजेच अगदी डिसेंबर जानेवारी महिन्यापर्यंत हे विमा संरक्षण मिळते.
हे लक्षात घेऊन राहिलेल्या दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांनी तत्काळ विमा उतरवावा, असेही बाळ माने यांनी सांगितले. ते म्हणाले काही शेतकऱ्यांनी आता जरी लावणी केली नसेल आणि १० ऑगस्ट पर्यंत जरी लावणी करणार असतील तरीही सातबारा आणि क्षेत्र दाखवून शेतकरी २३ जुलैपर्यंत हा पीक विमा घेऊ शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भातासाठी हमीभाव २७०० रुपये क्विंटलला जाहीर केला आहे. म्हणजे एक मणाला ९०० रुपये मिळतात.
गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर शेती करण्यात आली होती. गेल्या वर्षी १२०० शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. नुकसानग्रस्त २७५ शेतकऱ्यांना सुमारे १३ लाखांची भरपाई मिळाली होती.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंक, अग्रणी बॅंक असलेली बॅंक ऑफ इंडिया तसेच कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार यांनी लक्ष घालावे, असे आवाहन बाळ माने यांनी केले आहे.
पीक विमा ही शासनाची अत्यंत उपयुक्त योजना असून
गतवर्षी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पीकविमा उतरविण्याचे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी होते.
गतवर्षी केवळ ३०७ कर्जदार शेतकरी यांनी आणि विना कर्जदार २०२५ शेतकऱ्यांनी असे मिळून जिल्ह्यातील एकूण २३३२ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला. कोकणातील एकूण ८० हजार ११४ शेतकऱ्यांनी गतवर्षी पीकविमा उतरवला होता. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ २३३२ शेतकऱ्यांचा समावेश होता. हे प्रमाण ३ टक्केही नाही.
त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा घेऊन आपले पीक संरक्षित करावे, असे आवाहन बाळ माने यांनी केले आहे.
रत्नागिरी प्रतिनिधी : विकास धुत्रे
0 Comments